देवेंद्र फडणवीस यांची उद्योगपतींशी चर्चा

महाराष्ट्र
 15 Apr 2020  291


*कोरोना लॉकडाऊन काळातील अडचणी,*
*नंतरच्या काळातील उपाययोजना यावर चर्चा*

लोकदूत वेबटीम 

मुंबई, 15 एप्रिल


कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अडचणी, नंतरच्या काळात अपेक्षित उपाययोजना याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. प्रत्येक क्षेत्रातील सद्यस्थितीबाबत त्यांनी सविस्तर मते जाणून घेतली.

या संवादसेतूमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे डॉ. पवन गोयनका (ऑटोमोबाईल्स), फिनिक्स मार्केटसिटी अतुल रूईया (रिटेल आणि मॉल्स), रेमंड्स समूहाचे गौतम सिंघानिया (वस्त्रोद्योग), रहेजा समूहाचे रवी रहेजा (हॉस्पिटॅलिटी, आयटी, रिटेल), सिद्धार्थ रॉय कपूर (चित्रपट निर्मिती), रियाझ अमलानी (हॉस्पिटॅलिटी अँड रेस्टॉरंट), नमन समूहाचे जयेश शाह (हॉटेल्स आणि पायाभूत सुविधा), वेल्सस्पन बी. के. गोयनका (वस्त्रोद्योग आणि पायाभूत सुविधा), एल अँड टीचे अनुप सहाय (पायाभूत सुविधा, वीज, संरक्षण), फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी (फूड सर्व्हिसेस), बीव्हीजेचे हनुमंतराव गायकवाड (अन्नप्रक्रिया, सेवा) आदी सहभागी झाले होते.

प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात येत असलेल्या अडचणी, या अडचणींवर सर्वांचे हित राखत सर्वांनी मिळून केलेली मात, आगामी काळात कराव्या लागणार्‍या उपाययोजना इत्यादींबाबत अभ्यासपूर्ण चर्चा झाली. उद्योजकांनी आपल्या संकल्पना, सूचना, शिफारसी इत्यादी यावेळी मनमोकळेपणाने मांडल्या. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे संवादसत्र अतिशय अभ्यासपूर्ण झाले आणि यातून आपल्यालाही अनेक नवीन बाबींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या संकटकाळात तर आपण एकत्र येऊन अनेक समस्यांवर मात करतोच आहोत. अशीच मात आपण सारे मिळून येणार्‍या काळात सुद्धा करू. प्रत्येक क्षेत्राच्या फेरउभारणीसाठी सारे मिळून सामूहिक प्रयत्न करू. अशाप्रकारचे आणखी संवाद येणार्‍या काळात करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविला.