दुष्काळ निवारणासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल

महाराष्ट्र
 06 May 2019  357

दुष्काळ निवारणासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथिल 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय निवडणूक आय़ोगाने घेतला. आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून आयोगाकडे मागणी केली होती.
राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. व्यापक लोकहिताचा विचार करून या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले.
दुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळविल्याने दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळ सदस्यांना दौरे काढता येणार आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेशित करता येणार आहे.
दुष्काळ निवारणासंदर्भातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती देता येणार असून पाणी टंचाईच्या ठिकाणी कुपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कामांच्या निविदा नव्याने मागविण्यासह निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे तसेच निविदा संदर्भातील इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यानुसार करार करणे आणि संबंधित कामेही करता येणार आहेत. त्यामध्ये रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.