मुख्यमंत्री 5 वर्षातील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवणार , 1ऑगस्ट पासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

महाराष्ट्र
 24 Jul 2019  361

मुंबई दि 24 प्रतिनिधी 

देवेंद्र फडणवीस यांची १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा

राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत  तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून  १ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून  सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिकयेथे होणार आहे. 

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे.   यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत  सभा होणार आहेत. याशिवाय एकुण २३८ पेक्षा अधिक  गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हे आहेत. 

यात्रेच्या प्रवासाचे विभागश : विवरण पुढीलप्रमाणे - 

  • विदर्भ-  १,२३२ किलोमीटर (४४ मतदारसंघ)
  • उत्तर महाराष्ट्र - ६३३ किलोमीटर (३४ मतदारसंघ )
  • मराठवाडा - १,०६९ किलोमीटर (२८ मतदारसंघ)
  • पश्चिम महाराष्ट्र - ८१२ किलोमीटर (२९ मतदारसंघ) 
  • कोकण - ६३८ किलोमीटर (१५ मतदारसंघ)


यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी आणि समारोप प्रसंगी  भारतीय जनता पार्टीचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. फडणवीस सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रेबरोबर असणार आहे. तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यात्रा ज्या-ज्या जिल्ह्यांतून प्रवास करेल तेथे त्या-त्या जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

चौकट .....स्वप्न बघण्याचा शिवसेनेला अधिकार 

मुख्यमंत्री कुणाचा असावा याचे स्वप्न बघण्याचा अधिकार शिवसेनेला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत  निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रिय नेतृत्व अमितभाई शाह आणि मुख्यमंत्र्यांचा आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जे काम आपल्याला नेमून दिले आहे ते काम आपण करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.रथयात्रा काढून मुख्यमंत्री जनतेसमोर सरकारचा लेखाजोखा ठेवणार असून या दरम्यान शासकीय कामकाजात कुठेही खंड पडणार नाही. ही रथयात्रा म्हणजे विरोधकांचा खातमा असेल असेही यावेळी ना.पाटील म्हणाले.