उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावले

विधिमंडळ
 03 Mar 2022  388

मलिक यांचा राजीनामा घेणार नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावले

लोकदूत वेबटीम 

मुंबई 2 मार्च 


मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा याबाबतचा अंतिम अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो. मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही याबाबत महाविकास आघाडी ठाम असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.२) स्पष्ट केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडी तर्फे सांयकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान आयोजित करण्यात आले होते. विरोधी पक्ष भाजपाने या चहापानावर बहिष्कार टाकला होता. चहापाननंतर महाविकास आघाडीचे घटक पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. त्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही हा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. तसेच अटक कोणत्या कारणासाठी झाली हे कारण देखील त्यासाठी महत्त्वाचे असते.

मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही या भूमिकेवर महाविकासआघाडी ठाम आहे. सभागृह सुरू झाल्यानंतरही अनेक निर्णय होत असतात. पश्चिम बंगालमध्ये काही काही मंत्र्यांना अटक झाली आहे. मात्र ते मंत्रिपदावर कायम आहेत याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.


महाराष्ट्र राज्याला एक वेगळी संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला एक सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती दिली. मात्र सध्या जे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे ते सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही शोभा देणारे नाही. यामुळे राज्याचे महत्वाचे विषय बाजूलाच राहतात असेही अजित पवार म्हणाले.


राज्यात एसटीचा संप सुरू आहे त्याबाबत विचारले असता एसटीच्या विलीनीकरण संदर्भातील अहवाल तयार झाला असून परिवहन मंत्री अनिल परब हे हा अहवाल विधिमंडळात सादर करतील. त्यानंतर तो चर्चेसाठी सगळ्यांनाच प्राप्त होईल असे अजित पवार यांनी सांगितले.
----------------------------

मुख्यमंत्री उपस्थित राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही याबाबत पत्रकारांनी विचारले असता आज संध्याकाळी रामटेक येथे महा विकास आघाडीची बैठक आहे. त्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनाला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यपालांना विचारू :
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले  महामहीम राज्यपालांना आम्ही फोनवरून थेट विचारू शकत नाही. त्यामुळे कधीतरी चहा पिता पिता याबाबतचा प्रश्न त्यांना विचारू.
पाच दिवस कळ काढू :
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सात मार्चला सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी केली आहे त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले आज दोन तारीख आहे सात तारखेला फक्त पाच दिवस उरले आहेत. आता आपण पाच दिवस कळ काढू या.
अध्यक्ष निवड होणार :
मागील अधिवेशन फक्त पाच दिवस होते.त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.मात्र आता जास्त दिवसांचे अधिवेशन आहे.त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीचे पत्र राज्यपालांना पाठविले असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.