पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा-महाविद्यालय बंद
# मुंबई,नवी मुंबई,ठाणे,पिंपरी-चिंचवड,पुणे नागपूर शहरात जिम, स्विमींग पुल, चित्रपट व नाट्यगृहे बंद
लोकदूत वेबटीम
मुंबई, 13 मार्च
देशभरात दहशत माजवणारा कोरोना महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आव्हान देण्याच्या तयारीत असतानाच त्याला परवण्याची सर्व तयारी राज्य सरकारने केली असून घरोघरी कोरोनाची खबरदारी घ्यावी. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केले.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना ग्रस्त रुग्ण पुणे शहरात आढळल्याने पुण्यातील शाळा-महाविद्यालयांना 30 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय मुंबई, नवी मुंबई, पुणे - पिंपरी चिंचवड, ठाणे आणि नागपूर या सहा शहरात खबरदारीचा उपाय म्हणून माॅल्स मधील गर्दी टाळावी असे आव्हान देखील ठाकरे यांनी यावेळी केले.
दरम्यान या सहा शहरांमध्ये जिम, स्विमिंग पूल, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आज रात्री पासूनच बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज सतरा इतकी झाल्यानंतर सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात असल्याने या शहरातील शाळा महाविद्यालये 30 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर सरकारचे लक्ष असून चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि इराण या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस निगराणीखाली ठेवून त्यांच्या स्वतःच्या घरातच अलगीकरण च्या स्वरूपात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या देशातून जे रुग्ण येतील त्यांना मात्र विमानतळावरच विलगीकरण करून त्यांच्यावर ती 14 दिवस उपचार करण्यात येणार आहेत.
मात्र महाराष्ट्रात आलेले रुग्ण हे अमेरिका आणि दुबईतून आले असल्याने या दोन देशांचा समावेश देखील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांच्या तरतुदीत करण्यात यावा यासाठी केंद्र सरकारला विनंती केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
परिक्षा वेळापत्रकानुसारच
पुणे व पिंपरी चिंचवड मधील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असली तरी दहावी व बारावीच्या परीक्षा मात्र वेळापत्रकानुसारच होतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले.
याशिवाय राज्यलोकसेवा आयोगामार्फत ( एम पी एस सी ) आरटीओ या पदासाठी परीक्षा होत आहे तीदेखील ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शाळा व महाविद्यालयीन परीक्षा बाबत मात्र 30 मार्च नंतरची परिस्थिती पाहून नियोजन करण्याचे आदेश दिले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली
... सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमावर बंदी ..
राज्यात विविध ठिकाणी होणार्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ज्या सार्वजनिक कार्यक्रमांना यापूर्वी परवानगी दिली असेल त्यात सर्व परवानग्या रद्द करण्यात येऊन नव्याने कुठलीही परवानगी दिली जाणार नाही असेही ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान लग्न समारंभ या कार्यक्रमात लोकांनी गर्दी करू नये असे आवाहनही सरकारच्यावतीने करण्यात आले.