कंगनामागचा बोलवता धनी कोण - नवाब मलिक

मंत्रालय
 17 Nov 2021  440

कंगनाचा बोलवता धनी सर्वांनाच माहिती
-नवाब मलिक यांचा पुन्हा भाजपवर निशाणा

लोकदूत वेबटीम 
मुंबई 17 नोव्हेंबर 


एक महिला बापूंच्या (महात्मा गांधी) विरोधात बोलल्यामुळे गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी (ता.१७) वादग्रस्त विधाने करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौटला फटकारले. तसेच कंगनाचा बोलवता धनी सर्वांनाच माहिती आहे, असा दावा मलिक यांनी केला.

महात्मा गांधी हे व्यक्ती नव्हे तर मानवतेचा वैश्विक विचार आहेत आणि हा विचार जगाने स्वीकारला आहे, असेही मलिक यांनी आवर्जून नमूद केले.  

अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली एक महिला दिवसभर काहीही बरळत असते. तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत. जे अशा लोकांना पुढे करत आहेत. त्यांना कळले पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही, असे मलिक यांनी ठणकावून सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू व अनेक त्यागी व कृषितुल्य स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात नियोजन पद्धतीने वातावरण निर्माण करण्याचे काम सुरु आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोक बोलत आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला.

कंगना रनौटने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम सुरु केले आहे. अहिंसेचा विचार साऱ्या जगाने स्वीकारला आहे. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवले तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो. मात्र  तिचा बोलविता धनी कोण आहे, हे देशाला माहीत आहे असेही मलिक म्हणाले.

ज्या लोकांनी बापूंची हत्या केली. ते पण बापूंच्या विचारांना पराभूत करु शकले नाहीत.  बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. यामुळेच एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील. हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे असे मलिक यांनी म्हटले.
----------