मंत्री नवाब मलिक यांचा फडणवीसांवर आरोप

मंत्रालय
 07 Sep 2021  500

मंत्र्यावर आरोप करण्यापूर्वी अधिकारी फडणवीसांना भेटलेले


-सरकारच्या बदनामीसाठी भाजपचे नियोजित षडयंत्र

-राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

 

लोकदूत वेबटीम

 मुंबई 7 सप्टेंबर

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात, असा आरोप करत हे नियोजित कारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिला.


मलिक यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना हा गंभीर आरोप केला. मलिक म्हणाले, काही आयपीएस, आयएएस अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असते. त्यांच्या भेटी आम्ही योग्य  वेळी उघड करणार आहोत.


काही अधिकारी आघाडी सरकारवर आरोप करण्यापूर्वी त्यांच्या फडणवीस यांच्यासोबत बैठका झाल्या होत्या. आघाडी सरकारविरोधात ठरवून कारस्थान केले जात आहे. कोणते अधिकारी आणि विरोधी पक्षनेते आरोप करण्यापूर्वी कुठे भेटले याची माहिती जाहीर करु, असे मलिक यांनी सांगितले.


देशातील तपास संस्थांचा सध्या राजकीय वापर होतो आहे, हे आता लपून राहिलेले नाही. ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर आता न्यायालयानेच प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते आम्हाला जेवढे हैराण करतील तेवढी जनता आमच्यासोबत राहील, असा दावा मलिक यांनी केला.


भाजप विरोधी पक्षांचे सरकार ज्या राज्यात आहे, त्या सरकारला बदनाम करण्यासाठी, त्या सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट रचला जात आहे. अनिल देशमुख, भावना गवळी, अनिल परब, प्रताप सरनाईक, संजय राऊत या सर्वांना राजकीय हेतूने टार्गेट केले गेले. हे सर्व कारस्थान भाजप करत आहे, असेही मलिक म्हणाले.

-------------------------------------------------------------------------

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांचा आरोप फेटाळून लावला आहे. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत कामानिमित्त अधिकारी हे माजी मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेत्यांना भेटत असतात. त्यामुळे त्याचा अर्थ वेगळा काढणे योग्य नसल्याचे दरेकर म्हणाले.