मुंबई भाजप पोहचणार 10 लाख लोकांपर्यंत

मुंबई
 28 Mar 2020  292


*अन्न-औषध वितरणाला सर्वोच्च प्राधान्य द्या : देवेंद्र फडणवीस*

लोकदूत वेबटीम 

मुंबई, 28 मार्च


कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असताना एकट्या मुंबई महानगरातील 10 लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार आज मुंबई भाजपाने केला. ही मदत करताना अन्न आणि औषधी याला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
मुंबई प्रदेश भाजपाचे जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि भाजपाच्या सर्व नगरसेवकांसोबत पहिल्या संवादसेतूच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि अन्य नेते सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जरी आपण 20 लाख नागरिकांपर्यंत सेवाकार्य पोहोचविण्याचे ठरविले असले तरी केंद्राकडून 50 लाख गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात मुंबईने 10 लाखांचे उद्दिष्ट गाठायचे आहे. आज कुठे काय होतेय किंवा कुठे काय कमतरता आहे, याकडे लक्ष न देता ही आपली जबाबदारी आहे, हे समजून प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने स्वत:ला झोकून देण्याची नितांत गरज आहे. संपूर्ण देश हा आपला एक परिवार आहे आणि प्रत्येकाला या राष्ट्रकार्यात योगदान द्यायचे आहे.
नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डात विशेष जबाबदारी घ्यायची आहे. आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात प्रत्येकाला मिळतील, हे त्यांनी सुनिश्चित करायचे आहे. मुंबईत रेल्वेस्थानकालगत किंवा पुलांखाली अनेक लोक राहतात. त्यांची संख्या मोठी आहे. आसपासच्या परिसरातील आदिवासी पाडे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुद्धा आपले प्राधान्य असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवकांनी जनता किचनच्या माध्यमातून गरजूंना भोजन, भाजीविक्रेते आणि गृहनिर्माण सोसायट्या यांच्यात समन्वय, फळवाटप, सॅनेटाईझर आणि मास्कवाटप असे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आपआपले अनुभव आणि त्यात येणार्‍या अडचणी, त्यावर उपाय इत्यादींबाबत यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली.