शरद पवार यांनी त्या जातीसाठी काहीच केले नाही - शिक्षण मंत्री विनोद तावडे

मुंबई
 17 May 2019  356

मुंबई  लोकदूत वेबटीम 

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वत भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, पण त्या जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार यांनी लक्षात ठेवावे असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ठामपणे सांगितले.

शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना श्री.तावडे यांनी आज सांगितले की, पवार यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले आहे की, फडणवीसांची जात मी गेल्या पाच वर्षात कधी काढली ? पण शरद पवार बहुधा विसरले की, ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे यांना मा.नरेंद्र मोदी यांनी जेव्हा राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले, त्यावेळी पवार यांचे वक्तव्य होते की, जुन्या काळात छत्रपती फडणवीस नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना नेमायला लागले आहेत. त्यामुळे इतका विखारी जातीयवाद  हा शाहु, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच पहायला मिळाला आहे अशी टीकाही तावडे यांनी केली. तरुणांना हे अजिबात आवडत नाही,  विकासावरच राजकारण केलं पाहिजे  आणि प्रगतीवरच राजकारण केल पाहिजे असा हा पुरोगामी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मानतो असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या निवडणूक प्रचारसभेत स्पष्ट केले आहे की,  राहुल गांधी आणि विरोधकांनी सगळयांनाच शिव्या दयायला सुरुवात केली आहे. असे सांगतानाच तावडे म्हणाले की, तुम्ही  व्यक्ती म्हणून टीका करा. पण समुह म्हणून, जात म्हणुन, समुदाय म्हणुन टीका करु नका.

काल सुप्रिया सुळे व राहुल शेवाळे यांच्यामधील एक ऑडिओ क्लीप वायरल झाली आहे, त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तावडे म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको होते. त्या अशा प्रकारचे वक्तव्य कधी करताना आपण ऐकलेले नाही, परंतु कधी कधी ज्यावेळी समोर पराभव दिसायला लागतो तेव्हा भान राहत नाही आणि माणूस असा सैरावैरा वागायला लागतो अशी टीकाही त्यांनी केली.

राहुल गांधी यांनी  काल केरळ मध्ये ज्या पध्दतीने हिंदु परंपरेने पुजा केली त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले की, गांधी परिवारामध्ये एक मोठा चांगला बदल झाला आहे. एका बाजुला धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्मांना लांब ठेवायचे आणि विशिष्ट धर्माला जवळ करायचे असे मानणारा गांधी परिवार आता विविध धर्मांच्या प्रथेप्रमाणे, पुजे प्रमाणे आपले भाग्य आजमावायला लागल्याचे चित्र काल पहिल्यांदा दिसले. पण आता हे मनापासून आहे की, केवळ निवडणुकांपुरत आहे, हे मात्र आता येत्या काळात कळेल असेही तावडे यांनी सांगितले.