महाराष्ट्रात दर दिवसाला होणार 5500 कोरोनाच्या चाचण्या

महाराष्ट्र
 31 Mar 2020  363

*.  21 लॅब मध्ये दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या

 *. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

लोकदूत वेबटीम 

मुंबई 31 मार्च 

राज्यात कोरोना चाचण्या करण्याची सर्वाधिक क्षमता महाराष्ट्राची असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.देशात महाराष्ट्रात सर्वाधिक १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या उभारण्यात आल्या असून या माध्यमातून दररोज ५५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती ना.टोपे  यांनी दिली. राज्यात आतापर्यंत ६३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. 

सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

राज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्याद्वारे दररोज सुमारे २८०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. मात्र सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून  कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी संगितले. 

राज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या एन ९५ मास्क दीड लाख एवढे उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई कीटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजुनही ही साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून उद्यापासून राज्यात या योजनेमध्ये सुमारे एक हजार रुग्णालये सहभागी होणार आहेत त्याद्वारेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.