# राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७
# राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन)
# भरती करण्यात आलेल्यापैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह तर १०७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
लोकदूत वेबटीम
मुंबई २४ मार्च
राज्यात काल रात्रीपासून नव्याने १८ रुग्णांची नोंद झाली आहे . त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली असून नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे. . या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकटच्या संपर्कातील असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ना. टोपे म्हणाले सोमवारी संध्याकाळी की, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना बाधित असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून सदर गृहस्थ हे दुबई मध्येच स्थायिक आहे. परंतु १५ मार्च २०२० रोजी अहमदाबाद येथे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. दिनांक २० मार्च २०२० पासून त्यांना ताप येणे सुरु झाले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचार घेत असतानाच त्यांना खोकला आणि श्वासास त्रास व्हायला सुरु झाले. दिनांक २३ मार्च रोजी ते कस्तुरबा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याचे ना. टोपे यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे.
आज परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) करण्यात आले आहेत. या रुग्णांना १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०७ जण पॉझिटिव्ह आले असल्याचे ना. राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणा-या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये असल्याची माहिती यावेळी दिली.
राज्यातील जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील रुग्णांचा तपशील
पिंपरी चिंचवड मनपा १२
पुणे मनपा १८
मुंबई ४१
नवीमुंबई, कल्याणडोंबिवली ५
नागपूर, यवतमाळ,सांगली
प्रत्येकी ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी ३
सातारा २
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी 1
एकुण 107